नवनिर्माणाचा प्रामाणिक प्रयत्न


पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघ आणि भाजपा यांच्या राजकीय विचाराचे महत्त्वाचे दार्शनिक मानले जातात. कम्युनिझम आणि भांडवलशाही यांच्यापेक्षा वेगळा, काँग्रेस आणि समाजवादी यांच्याहून भिन्न आणि सहजी लेबल लावता येणार नाही असा अतिशय वेगळा राजकीय विचार त्यांनी मांडला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि विचाराची छाप आजही भाजपाच्या नेत्यांवर आहे. भाजपा आज पूर्ण बहुमताने सत्तेत आहे. त्यामुळे त्यांच्या पूर्वसुरींच्या विचाराची चिकित्सा अतिशय महत्त्वाची आहे.

नानाजी देशमुख

स्व. नानाजी देशमुख हे माझे नातेवाईक. त्यांनी पं. दीनदयाळजींची मला सांगितलेली एक आठवण बोलकी आहे. नानाजी आणि पंडितजी आग्रा येथील वास्तव्यात एकदा बाजारात पिशवी घेऊन भाजी आणायला गेले होते. त्या वेळी दीनदयाळजींच्या खिशात तीन-चार पैसे होते. ही गोष्ट बहुधा 1942 सालची आहे. त्या वेळी दीनदयाळ तिथे एम.ए. करत होते. या दोघांनी दोन पैशाची भाजी विकत घेतली. मुक्कामी परत आल्यावर दीनदयाळ प्रचंड अस्वस्थ झाले. त्यांच्या लक्षात आले - आपल्या खिशात कुणाकडून तरी आलेला एक खोटा पैसा होता. तो चुकून त्या भाजीवाल्या बाईला दिला. मग नानाजींना घेऊन दीनदयाळ पुन्हा बाजारात गेले. पुन्हा ती भाजीवाली शोधली. तिचा बटवा पुन:पुन्हा तपासून त्यातला खोटा पैसा शोधून काढला. तिला खरा पैसा दिला - खोटा पैसा पुन्हा परत घेतला. पुन: मुकामी परत येताना तो पैसा पंडितजींनी तळयात फेकून दिला आणि म्हटले, ''आपण आपल्या नकळत चुकूनही जरी समाजाला फसवले, तर ते सर्वात मोठे पाप!''

जमीनदारी नष्ट करण्याच्या कायद्याला समर्थन दिले नाही, म्हणून दीनदयाळजींनी स्वत:च्या पक्षाचे सहा आमदार राजस्थान विधानसभेतून निलंबित केले होते, ही घटना प्रसिध्द आहे. अशी नैतिकता 1947 नंतरच्या भारतीय राजकारणात दुर्मीळ आहे.

प्रस्तुत लेखात आपण पंडितजींच्या विचाराची चिकित्सा करायची आहे. तत्पूर्वी त्यांचे न्यायप्रिय आणि प्रामाणिक व्यक्तित्व समजून घेणे आवश्यक आहे.

लेखकाची भूमिका

भाजपामध्ये अंतर्गत लोकशाही मजबूत आहे आणि निवडणुकीच्या तंत्रात हा पक्ष अतिशय सक्षम आहे. संघाच्या केडरचे बळ, सर्व पातळयांवरील सक्षम नेतृत्व आणि उत्तम आर्थिक स्रोत यामुळे भाजपा हा भारतीय राजकारणातील सर्वात प्रबळ पक्ष म्हणून उदयाला आलेला आहे. परंतु राजकारणाच्या वैचारिक वादविवादात आणि राज्यशास्त्राच्या ऍकॅडमिक चर्चेत काहीतरी अडले आहे. भाजपाच्या नेत्यांची बहुतांश वक्तव्ये वादग्रस्त का ठरतात? त्यावर चहूबाजूंनी टीका का होते? त्यावर काही उपाय आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखात केला आहे. आजची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय राष्ट्रवादाच्या दृष्टीने हा सवाल निर्णायक आहे.

एकात्म मानववाद

मानवेंद्रनाथ रॉय यांनी मूलगामी मानवतावादाची (Radical Humanismची) घोषणा केली होती. कारण, कलिकास्वप्न आणि क्रांती (Reason, Romanticism and Revolution) यावर रॉय यांचा मानवतावाद उभा होता. त्यास प्रत्युत्तर म्हणून 22 ते 25 एप्रिल 1965 रोजी सलग चार भाषणे देऊन पंडितजींनी 'एकात्म मानव दर्शन' मांडले. ही भाषणे अर्चना प्रकाशन, भोपाळ यांनी 2010 साली प्रकाशित केली आहेत. प्रस्तुत लेखासाठी संदर्भ म्हणून ते पुस्तक वापरले आहे. या लेखातील संदर्भाचा कंसातील आकडा त्या पुस्तकाचा पृष्ठ क्रमांक आहे.

1965 सालीच 'एकात्म मानव दर्शन' जनसंघाने आपली राजकीय विचारसरणी म्हणून स्वीकारले. या एकात्म मानव दर्शनाची स्वत:ची स्वतंत्र परिभाषा आहे. ती परिभाषा आणि हा विचार आजही - पन्नास वर्षांनंतरही - भाजपाच्या जेष्ठ नेत्यांच्या भाषणातून डोकावताना दिसतो. इतका तो परिणामकारक आहे.

नवनिर्मिती

पंडितजींच्या विचारावर गोळवलकर गुरुजींची सावली आहे. तरीही ही राजकीय मांडणी गोळवलकरांची नाही. एकात्म मानव दर्शन हे दीनदयाळांचे स्वतंत्र चिंतन आहे. त्यातील काही संकल्पना अतिशय नावीन्यपूर्ण आणि खऱ्या अर्थाने आधुनिक पुरोगामी आहेत. असे महत्त्वाचे एकूण आठ आधुनिक विचार या 80 पानी भाषणात आलेले आहेत.

1) बेबंद भांडवलशाहीला विरोध, कारण ती व्यक्तीचे शोषण करते व त्याला बाजारू बनवते. (21, 63)

2) कम्युनिझमला विरोध, कारण त्यात व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे दमन होते. (21)

3) भांडवलशाही, कम्युनिझम आणि युरोपीय बनावटीचा राष्ट्रवाद यातील आपल्या देशाला उपयुक्त ते घ्यावे - अंधानुकरण कसलेच करू नये. युरोपीय राष्ट्रवाद क्रौर्य आणि द्वेष यावर उभा आहे. हिटलरी राष्ट्रवाद वाईट आहे. विश्व के लिये संकट! (15, 19)

4) पुरोगामी आणि प्रतिगामी या दोघांचा निषेध : पुरोगामी विचार भारतात युरोपातील थिअऱ्यांचे प्रतिबिंब पाहतो, ते अंधानुकरण आहे. प्रतिगामी लोकांना काळाचे चक्र उलटे फिरवून जुनी व्यवस्था आणायची आहे. ते चूक आहे. अशक्यही आहे. (17,18)

5) संस्कृतीचा नवा अर्थ : भारतीय संस्कृती ही प्रकृती आहे. ते वास्तव आहे. वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संस्कृतीचे संरक्षण करायचीही गरज नाही. त्यात योग्य ते बदल केले पाहिजेत. पण ती उद्ध्वस्त करू नये. (21, 78)

6) मानवी जीवन बहुरंगी आहे. त्याला आर्थिक, राजकीय, सामजिक अशापैकी एकाच चश्म्यातून पाहणे गैर आहे. मानवी जीवनाचा सर्वंकष विचार व्हावा. (43,22)

7) किमान जन्मसिध्द अधिकाराची संकल्पना : अन्न, वस्त्र व निवारा याबरोबरच मोफत आरोग्य सेवा, मोफत प्राथमिक व उच्च शिक्षण तसेच रोजगार याला उपाध्याय भारतीय नागरिकांचे जन्मसिध्द अधिकार मानतात. (68)

8) स्वदेशीवर भर, सत्ता आणि संपत्ती यांचे विकेंद्रीकरण, यंत्रांचा कालसुसंगत योग्य वापर, कामगार - सर्वहारा मानवाची प्रतिष्ठा आणि रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना चालना (76, 77)

चर्चेतील विचारवंत आणि नवी परिभाषा

राज्यशास्त्रीय परिभाषा आणि बुध्दिवादी पध्दती वापरत पंडितजींनी - मार्क्स, हेगेल, डार्विन आणि मॅक्डुगल (William McDougall) या चार पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांच्या विचाराची साररूप समीक्षा केली आहे. हेगेलने मांडलेला थिसिस-ऍंटीथिसिस-सिंथेसिसचा संघर्षमय विचार, मार्क्सच्या विचारातील दमन - व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच आणि आणि सर्वहाराची अनुत्पादक हुकूमशाही यावर पंडितजींनी नेमके बोट ठेवले आहे. (21) 1965 सालीच सोव्हिएत युनियनच्या भरभराटीच्या काळात त्यांनी कम्युनिस्टांच्या नेमक्या विकृतीवर प्रश्नचिन्ह उभे केले. आज काळाच्या कसोटीवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार खरे ठरलेले दिसतात. कम्युनिझमचा अंत पाहू शकणारे ते द्रष्टे पुरुष होते.

पंडित दीनदयाळ उपाध्याय

डार्विन आणि मॅक्डुगल याबाबत मात्र पंडितजींचे मंडन तत्कालीन आकलनामुळे मर्यादित बनले आहे. डार्विनबद्दल दीनदयाळजी लिहितात -

'बळी तो कान पिळी. मोठा मासा छोटया माशाला खातो असा डार्विनचा मत्स्य-न्याय आहे. (Survival of the fittest) जिसकी लाठी उसकी भैंस - असा डार्विनवर आधारित संघर्ष सिध्दान्त विकृत आहे. हा नियम म्हणजे व्यवस्था नव्हे - तर हा जंगलचा कायदा चालू नये म्हणून व्यवस्था बनवली पाहिजे." (23)

1965 साली डार्विनचे असे - बळी तो कान पिळी - साऱ्या जगाचेच आकलन होते. आज 2016 साली ते डार्विनबद्दलचे आकलन पूर्ण बदलले आहे. विस्तारभयास्तव अधिक खोलात जात नाही, पण ज्या मॅक्डुगल (William McDougall) या सामाजिक मानसशास्त्रज्ञाला (38 ) पंडितजी प्रमाण मानतात, तो आज कालबाह्य समजला जातो.

पंडितजी डार्विनला वंशवादी समजतात आणि त्यावर टीका करतात. मॅक्डुगलला राष्ट्रवेत्ता समजतात आणि त्याच्या संकल्पना वापरत एकात्म मानव दर्शनाची मांडणी करतात. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची मांडणी 1965 सालच्या जगाच्या आकलनाप्रमाणे योग्य असली, तरीही आज 2016 साली त्यात नव्याने भर टाकण्याची गरज आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय राज्यशास्त्राचे अभ्यासक, पाश्चात्त्य विचाराचे चिंतक-टीकाकार आणि नव्या मांडणीचे चाहते होते. पंडित दीनदयाळजींच्या अनुयायांनी त्यांच्याच पावलावर चालत सतत आधुनिक आणि नव्या मांडणीचा ध्यास घेतला पाहिजे. संस्कृतिरक्षण नव्हे, तर संस्कृतिसुधार हा पंडितजींचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या स्वत:च्या 1965 सालच्या मांडणीलाही तो लागू आहे.

मॅक्डुगलचा संदर्भ देत पंडितजी म्हणतात - 'माणसाला ज्याप्रमाणे मेंदू असतो, त्याप्रमाणे समाजालासुध्दा मेंदू असतो. प्रत्येक समूहाला एक मूलप्रकृती - समाजमन असते. सिध्दान्त आणि नीतीमध्ये यास 'चिती' असे म्हणतात.' (34, 38)

चिती, राष्ट्राचा आत्मा, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, पंथनिरपेक्षता, धर्मराज्य अशा पारिभाषिक शब्दात पंडितजी आपले एकात्म मानव दर्शन मांडतात. नव्या मांडणीवर आणि नव्या आकलनावर पंडितजींचा भर होता, असे या भाषणावरून स्पष्टच दिसते. दीनदयाळजी आर्थिक, सामाजिक बाबतीत त्यांच्या पूर्वसुरींच्या बरेच पुढे आलेले दिसतात. त्यांनी 1965च्या काळात तत्कालीन आकलन आणि परिभाषा वापरत मांडणी केली आहे. त्यांचा वारसा पुढे चालवणे म्हणजे सद्यःस्थितीत नवे विचार रुजवणे.

भाजपाची खरी अडचण

ही जुनी परिभाषा ही भारतीय जनता पक्षाची खरी अडचण आहे. 1965 सालची परिभाषा आज बदलायला नको काय? जेव्हा जनसामान्यांशी संवाद साधायचा आहे, तेव्हा त्यांना समजेल अशा भाषेत बोलायला नको काय? आजच्या राजकीय चर्चा आजच्या परिभाषेत नकोत काय? भाजपा मनूवादी असल्याचा राहुल गांधी यांनी नुकताच भाजपावर आरोप केला आहे. भाजपा प्रतिगामी, पुराणमतवादी, जातीयवादी, वर्णवादी असल्याचे आरोप सतत होत असतात. भाजपाला घटना बदलायची आहे - धर्मशास्त्राचे राज्य आणायचे आहे, अशीही टीका होत असते. राजनाथजींनी मागे पंथनिरपेक्षतेबद्दल एक विधान केले होते. ते बरेच गाजले. पंथनिरपेक्षता हा शब्द गोळवलकर गुरुजींच्या साहित्यात येतो, तसे त्याचे विवेचन दीनदयाळजींनी केलेले आहे. सध्या चर्चेत असणारे राज्यघटनेतील बदल, भारतमाता, धर्मराज्य, सेक्युलॅरिझम यावर पंडितजींनी या भाषणात विस्तृत भाष्य केले आहे. त्यातून आज काय अर्थ निघतो ते पाहू या आणि तसा अर्थ भाजपाला अभिप्रेत आहे काय? यावरही भाष्य करू या.

धर्म म्हणजे काय?

पंडित दीनदयाळ म्हणतात, 'धर्म म्हणजे नियम, व्यवस्था, आचरण, संहिता - ज्या अर्थ आणि काम यासंबंधी लागू असतात. धर्म म्हणजे सृष्टिनियम. धर्म म्हणजे मानवी जीवनाची धारणा करणारे नियम.' (24,28,29)

पंडित दीनदयाळांच्या संकल्पनेतला धर्म एका जागी स्थिर नाही. तो सतत बदलत आहे. नित्यनूतन आहे. धर्माच्या स्वरूपाविषयी भाष्य करताना पंडितजी लिहितात 'काळ आणि युग यानुसार धर्मनियम बदलत असतात. म्हणून देश-कालपरत्वे धर्माचे पालन करावे.'(48) पंडितजींचा हा विचार खरोखर आधुनिक आणि द्रष्टा आहे. काळाच्या पुढे पाहणारा आहे.

दीनदयाळजींचा धर्म सर्वव्यापी आहे. राष्ट्र (Nation) आणि राज्य (State) यातला भेद त्यांनी स्पष्ट करून सांगितला आहे. राज्य म्हणजे सरकार (45) आणि राष्ट्र म्हणजे भूमातेशी मनाने जोडला गेलेला लोकसमूह (37) अशी त्यांची व्याख्या आहे .

पंडितजी म्हणतात की, राष्ट्राची चिती (समूहमानस) हा राष्ट्राचा आत्मा आहे. योग्य काय आणि अयोग्य काय? हे ठरवणारी गोष्ट म्हणजे चिती. यासाठी त्यांनी मॅक्डुगलचा दाखला दिला आहे. (34,38). राष्ट्राची संस्कृती बदलू शकते. धर्मनियम बदलू शकतात. (39,48) परंतु राष्ट्राचे समूहमानस म्हणजेच चिती बदलू शकत नाही.

इथे पंडितजींनी राष्ट्राला स्वयंभू मानले आहे आणि राज्य (सरकार) ही राष्ट्राची गरज भागवणारी निमित्तमात्र संस्था मानली आहे. (41) आणि धर्म हा राज्यसंस्थेहून वरचढ मानला आहे. यापुढील भाष्यावरून वाद सुरू होतात.

राज्यापेक्षा धर्म श्रेष्ठ आहे हे समजावून देताना पंडितजी वैदिक राज्याभिषेक विधीचे उदाहरण देतात. त्या विधीत राजा तीनदा म्हणतो की, मला कोणीही शिक्षा/दंड देऊ शकत नाही. अदंण्डयोस्मि! अदंण्डयोस्मि! अदंण्डयोस्मि! मग पुरोहित त्याचा पाठीत धर्मदंडाने हलकीशी चापट मारून म्हणतो की धर्मदंडयोआस्त! म्हणजे हे राजा तुझ्यावर धर्म दंड आहे! धर्म श्रेष्ठ आहे!! (53)

पण याचा अर्थ थिओक्रॅटिक स्टेट नव्हे. थिओक्रॅटिक स्टेट म्हणजे विवक्षित पंथाचे राज्य असा पंडितजींचा युक्तिवाद आहे. (55) इथे धर्म आणि पंथ यातला फरक समजून घेतला पाहिजे. पंथ म्हणजे उपासनापध्दती - पूजा, नमाज, प्रेयर, आरती इत्यादी आणि धर्म म्हणजे मूलभूत नियम - उदा. आईवडिलांचा आदर करावा, मातृधर्म, पितृधर्म, शेजारधर्म इत्यादी. (52)

धर्म म्हणजे रिलिजन नव्हे  - तर पंथ म्हणजे रिलिजन होय - असा हा युक्तिवाद आहे.

भाषा आणि गैरसमज

या सर्व विवेचनातून फार विचित्र निष्कर्ष निघू शकतात. तसे ते निघतात. त्यामुळेच राजनाथ सिंह यांच्या विधानावरून मागे गदारोळ उडाला होता. धर्मनिरपेक्षता चूक - पंथनिरपेक्षता बरोबर! असे विधान त्यांनी केले होते. (TOI 27 November 2015)

याचा अर्थ भाजपाला सनातन हिंदू धर्माच्या कायद्याचे राज्य आणायचे आहे असे घेतला जातो. मनूवादी असल्याची पावती फाटते. मनुस्मृतीनुसार शूद्रांचे दमन करण्याची कटकारस्थाने म्हणून संघ-भाजपाच्या कृत्यांकडे पाहिले जाते. हे सर्व का? तर एका विशिष्ट परिभाषेमुळे !

पहिला प्रश्न असा की, पत्रकार-जनसामान्य-अभ्यासक यांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी बोलावे काय? की स्वत:च्या कोड लँग्वेजमध्ये म्हणजे पारिभाषिक शब्दरचनेत बोलावे? सगळे जग रिलिजनचे भाषांतर धर्म असे करते. धर्म-पंथ हा प्रकार समजावून सांगण्यासाठी मी वरचे दीड हजार शब्द वापरले आहेत. दर वेळी हे दीड हजार शब्द बोलावे लागतील अथवा पारिभाषिक शब्दयोजना टाळावी लागेल. अन्यथा भाजपा प्रतिगामी असल्याचे गैरसमज पसरत जातील.

पण गैरसमज नव्हेच!

दीनदयाळ यांची मांडणी नावीन्यपूर्ण आणि अभिनव आहे, हे आपण पाहिलेच. पंडितजींनी त्यांच्या 1965च्या आकलनानुसार आणखी काही निष्कर्ष काढले आहेत. 2016 साली त्यात भर घालणे - बदल करणे हेच दीनदयाळ यांचा वारसा पुढे नेण्याचे लक्षण आहे.

समाज आणि व्यक्ती याचे संबंध कसे असावेत? यावर भाष्य करताना दीनदयाळ म्हणतात - 'समाज आणि व्यक्ती यांचा संघर्ष नको. जातीविरुध्द जातीचा संघर्ष नको. आपल्या वर्णांची कल्पना विराट पुरुषाच्या चार अंगापासून आलेली आहे. विराट पुरुषाच्या डोक्यापासून ब्राह्मण, बाहूंतून क्षत्रिय, उरातून वैश्य आणि पायातून शूद्र निर्माण झाले. डोके, हात पाय यांचे काही भांडण असते काय? (44)

हा चातुर्वर्ण्याचा पुरस्कार आहे. यातली पायाची उपमा का सहन केली जावी? अशा उपमा वापरण्याने 2016 साली जातीय संघर्ष वाढतील की कमी होतील?

चातुर्वर्ण्याच्या समर्थनार्थ वापरला गेलेला 'विराट' शब्द शेवटच्या भाषणाच्या समारोपात पुन्हा वापरला गेला आहे. पंडितजी लिहितात -

'जैसे राष्ट्र का आधार चिति होता है, वैसेही जिस शक्ती से राष्ट्र कि धारणा होती ही उसे विराट कहते है। हमे अपने राष्ट्र के विराट को जागृत करने का काम करना है।'(79)

यानंतर जर कोणी म्हटले की संघ-भाजपाला भारतात चातुर्वर्ण्य आणि शूद्रांची गुलामगिरी पुन्हा आणायची आहे, तर त्याला उत्तर कसे देणार? हा समज म्हणावा की गैरसमज? या पारिभाषिक शब्दांच्या अर्थाचा कीस पाडत त्यातून आणखी दहा अर्थ काढता येतील. श्रोत्यांपैकी कोणालाही काहीही समजणार नाही! राहुल गांधींसारखे नवखे राजकारणीसुध्दा भाजपाला मनूवादी म्हणत आहेत याची नोंद घेतली पाहिजे.

एक मात्र निश्चित की ही परिभाषा भाजपाच्या हिताची नाही. देशाच्या हिताची तर नाहीच नाही.

दीनवाणे धर्म

मी स्वत: नास्तिक आहे. धर्म, पंथ यातले काहीही मानत नाही. तरीही हिंदू समाजाचे हित व्हावे, त्याचे रक्षण व्हावे, प्रबोधन व्हावे असे मला वाटते. हिंदू हा शब्द मी येथे समाज या अर्थाने वापरला आहे. मुस्लीम समाजाचेही प्रबोधन व्हावे, हित व्हावे असे वाटल्यास तो सेक्युलॅरिझमचा आग्रह धरेल.

पंथ की धर्मनिरपेक्षता की अधार्मिकता या वादातून काहीही साध्य होणारे नाही.

सेक्युलॅरिझम म्हणजे कायदे आधुनिक असतील. शासकीय निर्णयातून धर्म वगळा. धर्म दूर ठेवा म्हणजे सेक्युलॅरिझम. म्हणजेच इहवाद. हे सेक्युलॅरिझम आपल्या राज्यघटनेचा पाया आहे. दहीहंडीचे किती थर रचावेत? किती लग्ने करावीत? बुरखा घालावा का? अस्पृश्यता पाळावी का? तोंडी तलाक असावा का? या बाबतीत कायदे करण्याचा कोणताच हक्क धर्माला नाही. सर्व हक्क शासनाकडे आहेत. यालाच सेक्युलॅरिझम असे म्हणतात.

धर्म आणि पंथ या दोन शब्दांबद्दल पुरेसा गोंधळ आहे. अनेकांना वाटते - पंथ म्हणजे उपासनापध्दती आणि धर्म म्हणजे कर्तव्य! म्हणून ते पंथनिरपेक्षता हवी म्हणतात. हा भ्रम आहे. धर्म/कर्तव्य हेसुध्दा राज्यघटनेच्या अधिन राहून पार पाडायचे आहेत. अगदी माता-पिता-पुत्र-पत्नी या बाबतीतली कर्तव्येसुध्दा कायदा ठरवतो, धर्म नाही.

- वृध्दाश्रम पुराणात नाहीत, तरी ते बेकायदेशीर ठरवता येत नाहीत.

- धर्मातला वानप्रस्थाश्रम कायद्याने सक्तीचा करता येत नाही

सेक्युलॅरिझम हा शब्द घटनेत पहिल्या दिवसापासून आहे. धर्मनिरपेक्षता स्पष्ट करणाऱ्या घटनेच्या 25व्या कलमात तो आहे. पुढे हा शब्द घटनेच्या प्रास्ताविकातसुध्दा घातला गेला. पण त्यामुळे त्याच्या अर्थात काहीच फरक पडत नाही.

या आधुनिक कायद्यासंदर्भात बोलत असताना चिती, विराट, धर्म, पंथ वगैरे पारिभाषिक शब्द सोडून दिले पाहिजेत. पंथ म्हणजे उपासनापध्दती आणि हिंदू म्हणजे जीवनशैली असे म्हणणेही सोडून दिले पाहिजे.

इस्लामचेही म्हणणे नेमके हेच आहे. ते स्वत: उपासनापध्दती मानत नाहीत. 'दिन' मानतात. दिन म्हणजे जीवनशैली. काय खावे, प्यावे, ल्यावे याचे नियम म्हणजे दिन. किती लग्ने करावीत? काफिरांशी कसा व्यवहार करावा? याचे नियम म्हणजे दिन. म्हणजेच जीवनपध्दती.

माझा तो धर्म आणि तुझा तो पंथ असे म्हटल्याने सर्वच धर्म दीनवाणे ठरले आहेत!

सेक्युलॅरिझम : हिंदुहिताचे शस्त्र

राजकीय, सामाजिक, बौध्दिक, वैचारिक नेतृत्वाचा हिंदू समाजात दुष्काळ आहे. स्वत:स हिंदू म्हणवणारे राजकीय नेतृत्व उभे राहिले आहे, पण त्या समाजाच्या हिताचे काय? सामाजिक प्रश्नांचे काय? वैचारिक गोंधळाचे काय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावणे ही एक चांगली गोष्ट आहे. त्यांचे विचारही आत्मसात केल्यास आणखी उत्तम होईल. बाबासाहेबांनी सेक्युलॅरिझमवर नेमके भाष्य केले आहे. याविषयीच्या घटना परिषदेतील चर्चेत बाबासाहेब म्हणतात -

'भारतातील (सर्व) धर्म केवळ असामाजिकच नव्हे, तर समाजविरोधी आहेत. मीच सत्य इतर असत्य (वा मीच धर्म इतर पंथ) असे ते धर्म मानतात. मुस्लिमांचा असा विश्वास आहे की, इस्लामवर श्रध्दा जे ठेवत नाहीत, त्यांच्याशी बंधुत्वाचा व्यवहार करू नये.' (समग्र डॉ आंबेडकर खंड 13 पृष्ठ 423, 425)

श्रध्देचे स्वातंत्र्य देण्यासाठी सेक्युलॅरिझम नाही, तर धर्मात बदल करण्यासाठी आहे

धर्म-पंथाचे शाब्दिक घोळ पंडितजींच्या एकात्म मानव दर्शनात आहेत. पण तो पंडितजींचा उद्देश होता काय? धर्मातील बदलाला - सुधारणेला विरोध करणे हा दीनदयाळ उपाध्याय यांचा हेतू होता काय? मला वाटते - त्यांचा हेतू तसा नसावा. नाहीतर धर्म नित्यनूतन सतत बदलणारा आहे असे पंडितजी म्हणाले नसते. (48)

1965 साली दीनदयाळ उपाध्याय यांनी पाश्चात्त्य राज्यशास्त्र, तत्त्वविचार, अर्थशास्त्र याचे खंडन-मंडन करत जनसंघाला आधुनिक राजकारणाचे परिप्रेक्ष्य दिले.

आज 2016 साली जर तो वारसा पुढे चालवायचा असेल, तर धर्म-पंथ-अधर्म इत्यादी कालबाह्य शब्द सोडून देऊन, आधुनिक राष्ट्रवाद, बुध्दिवाद आणि सेक्युलॅरिझम यांची कास धरणे आवश्यक आहे. दीनदयाळ उपाध्याय यांनी आरंभिलेले नवनिर्मितीचे चक्र गतिमान ठेवत या विषयांवर अभ्यास, चिंतन, मनन, नूतन मंडन हीच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली ठरेल.

हिंदू समाजाचे हित करू पाहणारे, भले पाहू इच्छिणारे अनेक लोक भाजपात आहेत या विश्वासापोटी अतिशय तळमळीने प्रस्तुत लेख लिहितो आहे. मंथन-प्रबोधन हा राष्ट्रवादाचा आणि राजकारणाचा पाया आहे, निदान तसे झाले तरी पाहिजे.

एकात्म मानव दर्शन

बटाटयाचे पोते आणि किराण्याचे दुकान

डॉ. आंबेडकर म्हणाले होते, ''हिंदू म्हणजे काय - तर किराण्याचं दुकान. किराण्याच्या दुकानात आपण गेलो, कांदे मागितले कांदे मिळतील; बटाटे मागितले, बटाटे मिळतील; किराणा मागून बघा, किराणा मिळणार नाही. किराण्याच्या दुकानात किराणा सोडून सगळं मिळतंय. हिंदूंच्या बाजारात हिंदू सोडून सगळं मिळतंय!''

कार्ल मार्क्सने तुच्छतेने शेतकऱ्यांना बटाटयाच्या पोत्यांची उपमा दिली आहे. पोत्यात बटाटे गुंडाळलेले असतात; पोते ओतले की ते सैरावैरा पळू लागतात. मार्क्सची उपमा मोठया संख्येने शेतकरी असलेल्या हिंदू समजाला तंतोतंत लागू पडते.

एका बाजूला नाकाला फडकी बांधणारे अहिंसक आहेत, मंदिरात हजारो बोकडांच्या बळीप्रथेत रक्तमासाचा चिखल तुडवणारे काळूबाईचे भक्तही आहेत. एका बाजूला ब्रह्मचर्याचे स्तोम आहे, दुसऱ्या बाजूला योनिपूजा आणि घटकंचुकीचा खेळ आहे. 'पीत्वा, पीत्वा, पुन: पीत्वा' अशा रीतीने दारू पिऊन अवग्रहण, वमन आणि पतन हे सायुज्य मुक्तीचे टप्पे आहेत असे सांगणारे शैव तांत्रिक आहेत. सूक्ष्मातून खून करणारे सनातनी आहेत, योगसामर्थ्याने सिध्दी प्राप्त करणारे साधक आहेत आणि मनुष्य विष्ठा खाऊन तसलेच दैवी सामर्थ्य प्राप्त करणारे वारली जमातीचे भगतही आहेत. (स.ह.दे. 233)

पोराच्या अमेरिकेतील शिक्षणासाठी तयारी म्हणून त्याला मातृभाषेत बोलायला बंदी घालणारे मध्यमवर्गीय प्रेमळ पालक आहेत, पोलिसांचा मार खाण्यासाठी तयारी व्हावी म्हणून मुलांना लहानपणापासून लाथाबुक्क्यांनी बडवणारे तितकेच प्रेमळ पालक पारध्यांतही आहेत.

धनाढयांच्या शौचकूपाला सोन्याच्या सिटा आहेत म्हणे, कचरापेटीत वाकवाकून अन्नकण शोधणाऱ्या आणि 'बाई केर आहे का हो?' असे विचारणाऱ्या कंगाल लहान मुली रस्तोरस्ती फिरत आहेत. (स.ह.दे. 233)

या किराणा दुकानात आणि बटाटयाच्या पोत्यात, चिती कुठे आहे? समाजमन कोठे आहे? कसले धर्म, पंथ, अर्थ, काम, मोक्ष? एकात्म मानव दर्शन या साऱ्यांना कवेत घेईल अशी आशा करू या.

जर हिंदू समाजाला चिती म्हणजेच समाजमन असेल, तर ते सतत परिवर्तनशील राहिले पाहिजे. याबाबतीत काही श्रेय संघाला आहेच. संघटन, शिस्तबध्दता हा हिंदू समाजाच्या मनात बिलकुल नसलेला गुण थोडाफार तरी रुजला आहे. हे समाजमनसुध्दा सतत बदलत राहिले पाहिजे, उत्क्रांत - आधुनिक होत राहिले पाहिजे.

एकात्म मानव दर्शनाच्या नवनिर्मितीचा प्रामाणिक प्रयत्न पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी केला. ते नवनिर्माणाचे चक्र अखंड गतिमान ठेवणे हीच त्यांना आदरांजली!